महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास
धाराशिव रिपोर्टर
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या बेंबळी जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घकालीन कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच धाराशिवचे भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी दुरगुडे यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे.
महेंद्र धुरगुडे हे यापूर्वी वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून सलग दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. या काळात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करत विकासकामांना गती दिली. रस्ते, पाणीपुरवठा,आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
त्यांच्या या कामाची पावती म्हणूनच यावेळी महायुतीने बेंबळीसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या गटातून त्यांना उमेदवारी दिली आहे.बेंबळी गट हा निवडणुकीच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा मानला जात असून येथे महायुतीने अनुभवी आणि विश्वासार्ह उमेदवारावरच विश्वास टाकल्याचे स्पष्ट होत आहे.
महेंद्र धुरगुडे यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बेंबळी गटात महायुती अधिक मजबूत होईल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, धुरगुडे यांनी उमेदवारीबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की,“महायुतीच्या नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवेन. बेंबळी गटातील प्रत्येक घटकाला न्याय देत सर्वसमावेशक विकास हाच माझा अजेंडा राहील.”
एकंदरीतच, महेंद्र धुरगुडे यांना मिळालेली उमेदवारी ही त्यांच्या कामाची पावती मानली जात असून, बेंबळी गटातील लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.























