धाराशिव मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हापरिषदेसाठी महायुतीकडे पाच जागेची मागणी
उमरगा विधानसभेतील बलसुर आणि दाळींब तर तुळजापूर मधील नंदगाव,बेंबळी आणि मंगरूळ
धाराशिव रिपोर्टर
राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरत असतानाच धाराशिव जिल्ह्यात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.अजित पवार राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडे थेट पाच जागांची मागणी करण्यात आली आहे.त्या मध्ये उमरगा विधानसभेतील दोन जागा तर तुळजापूर विधानसभेतील तीन जागेची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संभाव्य युतीबाबत राज्यपातळीवर सकारात्मक चर्चा सुरू आहेत.मात्र धाराशिव जिल्ह्यात वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.धाराशिव जिल्हयात अजित पवारांची राष्ट्रवादी महायुती सोबत जिल्हा परिषद निवडणुक लढवण्याची चिन्ह दिसत आहेत.अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र दुरगुडे यांनी तुळजापूर विधानसभे मधील नंदगाव,बेंबळी आणि मंगरूळ या तिन मतदार संघाची मागणी केली आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी उमरगा विधानसभेतील बलसुर आणि दाळींब या दोन मतदार संघाची मागणी केली आहे.अशा पाच जागा राष्ट्रवादीकडुन मागणी करण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुती मधून पाच जागांची ठाम मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. या मागणीमुळे जिल्हयात शरद पवार गटासोबत होणाऱ्या युतीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असतील, तर जागावाटपावर स्पष्ट तोडगा निघणे आवश्यक आहे. मात्र अजित पवार गटाची महायुतीकडे मागणी पाहता धाराशिव जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी खरोखरच एकत्र येणार का? की वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये निवडणूक लढणार,याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.आगामी काही दिवसांत युतीबाबत अधिकृत घोषणा होते का,की धाराशिव जिल्ह्यात वेगळे राजकीय समीकरण पाहायला मिळते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान धाराशिव जिल्हयात जिल्हापरिषदेच्या 55 जागेसाठी आणि पंचायत समितीच्या 110 जागेसाठी निवडणुक पार पडणार आहे.























