भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालना समोरच बोंबाबोंब आंदोलन
धाराशिव रिपोर्टर
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे करण्याऐवजी काही कामे निकृष्ट तर काही कामे न करताच बिले उचलून ग्रामसेवक, अभियंता व गट विकास अधिकारी यांच्या बनावट अहवालाच्या आधारे शासनाची दिशाभूल केली आहे. या माध्यमातून जवळपास दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवून देखील केवळ कागदोपत्री घोडे नाचविण्यामध्ये जिल्हा प्रशासन धन्यता मानत आहे. त्यामुळे वैतागलेल्या गावकऱ्यांनी संबंधित भ्रष्टाचाराऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरच दि.३० डिसेंबर रोजी दोन तास बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
लोहारा तालुक्यातील खेड येथे पंधराव्या वित्त आयोगामधून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यासाठी ७ लाख रुपये व नळ शिफ्टिंग (नळ कनेक्शन) साठी ४ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला. मात्र, ती कामे न करताच त्याची बोगस एमबी तयार करून त्याची बिले उचललेली आहेत. तर बांधकाम विभागाच्या माध्यमातून शाळेचे वॉल कंपाऊंड बांधकाम करण्याचा ठराव असताना अभियंत्यांनी तारेचे कंपाउंड केले आहे. त्यासाठी १ लाख ७५ हजार रुपये निधी दिला असून ते काम देखील अत्यंत निकृष्ट केलेले आहे. विशेष म्हणजे पाण्याची टाकी बांधली असून त्यास भेगा पडलेल्या आहेत. ती जमिनीवर केंव्हा कोसळेल ? हे सांगता येत नाही. तर पाईप जमिनीत बुजणे आवश्यक असताना फक्त खोदाई करुन त्यामध्ये पाईप देखील टाकलेले नाहीत. त्याबरोबरच महिला केंद्र बांधले असल्याचे दाखवून त्याचे बिल उचललेले आहे. मात्र गावात अशा प्रकारची कुठल्याही स्वरूपाची इमारत अस्तित्वात नाही. मात्र त्या नावाखाली देखील बोगस एमबी रेकॉर्ड तयार करून बिल उचलले आहे. यासंदर्भात गट विकास अधिकारी लोहारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून संबंधित दोषीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र कारवाई होत नसल्याने समाजसेवक अण्णाराव कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. तरी देखील प्रशासनाने यावर कुठलीच कारवाई केली नाही किंवा भूमिका घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष यांच्या दालनासमोरच ठिया देत बोंबाबोंब आंदोलन केले. त्यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर तासभर चर्चा केली. चर्चेनंतर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती खेड येथे येणार आहे. ती समिती गावात येऊन प्रत्यक्ष कामे झाली आहेत किंवा नाहीत ? तसेच निकृष्ट दर्जाची आहेत की नाहीत ? याची स्थळ पाहणी करून चौकशी करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी ते आंदोलन स्थगित केले. यावेळी आंदोलक अण्णाराव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य जया कांबळे, सीमा गायकवाड, सुदर्शन गव्हाळे, शिवा गायकवाड, दिलीप कांबळे, बालाजी कांबळे, गौतम गायकवाड, बळीराम बनसोडे, पप्पू गायकवाड, सुरज कांबळे, अण्णा कांबळे व बाळू सुरवसे आदी सहभागी झाले होते.























